टीम सत्ताकारण
मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा भुकंप झाल्यानंतर नवनवे वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. दरम्यान, गुवाहाटीला गेलेले सांगोला येथील आमदार शहाजीबापू पाटील यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्याअनुषगांनेच अभिनेते –प्रख्यात कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी सामाजिक विसंगती व्यक्त करणारी कविता केली असुन सध्या ही कविता खूपच व्हायरल झाली आहे.
“काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…एकदम ओके!’ शहाजीबापू यांच्या या शब्दांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यावर सौमित्र यांनी केलेली कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यावर लोक व्यक्त होत असुन त्या कवितेतुन त्यांनी सामाजिक परिस्थितीवर आसुड ओढले आहेत.
आपल्या कवितेत ते म्हणतात….
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील
काय गावकरी, काय सरपंच, काय पाटील
काय समाज, काय उमेदवार, काय पक्ष
काय आमदार, काय खासदार, काय लक्ष
काय नेता, काय जनता, काय विश्वास
काय खरं, काय खोटं, काय आभास
काय श्रीमंत, काय मध्यमवर्ग, काय गरीब
काय सुदैव, काय दुर्दैव, काय नशीब
काय मतदार, काय कॅांन्टीट्यूएंसी, काय सत्ता
काय फायस्टार, काय थ्री स्टार, काय गुत्ता
काय भाषणं, काय घोषणा, काय नारे
काय मौसम, काय वादळ, काय वारे
काय विचार, काय बांधिलकी, काय तत्वं
काय पक्षनेता, काय कार्यकर्ता, काय स्वत्वं
काय बातम्या, अन् अग्रलेख, काय संपादक
काय ढोबळ, काय वैचारिक, काय आस्वादक
काय चॅनल, काय मीडिया, काय पेपर
काय शिणिमा, काय स्टोरी, काय थिएटर
काय फेसबुक, काय वॅाट्सप, काय ट्विटर
काय ब्रिलियंट, काय बकवास, काय चीटर
काय युपी, काय महाराष्ट्र, काय बिहार
काय आर्थर, काय येरवडा, काय तिहार
काय सकाळ, काय दुपार अन् संध्याकाळ
काय विमान, काय पायलट, काय आभाळ
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील
काय गावकरी, काय सरपंच, काय पाटील
-सौमित्र






