भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा..

टीम सत्ताकारण

औरंगाबाद : भाजपकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना अंमलबजावणी संचलनालयच्या (इडी) माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे, ज्यांच्यावर आरोप केले जातात, ती मंडळी भाजपात आली की कारवाई थांबत आहे. असा आरोप करीत केवळ विरोधी पक्षांनाच लक्ष केले जात असल्याने ‘भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा’, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी क्रांती चौकात लावलेल्या अनोख्या पोस्टरने लक्ष वेधले आहे.

 

याबाबत श्री. पाटील यांनी म्हटले, की केंद्रामध्ये ऐतिहासिक बहुमताने भाजपचे सरकार सत्तेत आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये आज भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आहे. तरी एवढ्यावरच भाजपची सत्तेची भूक भागत नसल्यामुळेच विरोधी पक्षांचे सरकार साम-दाम-दंड-भेद वापरून पाडली जात आहेत. एवढ्यावर पण भाजप थांबायला तयार नाही.

 

विरोधी पक्षाच्या प्रमुख ज्येष्ठनेत्या सोनिया गांधी कॅन्सर सारख्या आजाराशी लढत असताना त्यांच्यासह राहुल गांधी इतर राज्यातील विरोधी पक्षांचे नेते यांच्यावरच केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून कार्यवाही केली जात आहे. ज्यांच्यावर आरोप केले जाते, ती मंडळी भाजपमध्ये गेली की चारित्र्यवान केले जात आहेत. त्यामुळे जनतेला माझे खुले आव्हान आहे, की भाजप नेत्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कार्यवाही झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कार्यवाही पुढे चालूच ठेवल्याचे दाखवा आणि लाख रुपये मिळवा, असे बक्षीस जाहीर केले आहे. यासंदर्भात शहरात लावलेले पोस्टर लक्ष वेधून घेत आहे.

 

Leave a Comment